भुमकर चौकातील वाहतूक कोंडीचा विळखा कधी सुटणार? नागरिक संतप्त
पिंपरी-चिंचवड, दि. १२ नोव्हेंबर – भुमकर चौकात कायमच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त वेळ लागतो, तर काहींना महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब होतो आहे. या मुळेच काही IT कंपन्या स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. साहजिकच याचा परिणाम स्थानिक रोजगारावर सुद्धा होणार आहे. भुमकर चौक हा मुख्य महामार्गांशी जोडणारा एक महत्त्वाचा चौक असल्याने येथून दररोज हजारो वाहनं जातात. परंतु, रस्त्याची अयोग्य रचना, मोठ्या वाहनांची वाहतूक, तसेच वाहतूक पोलिसांची कमी संख्या यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर होणारी वाहतूक वाढत आहे, आणि त्यामुळे प्रवाशांचा संतापही वाढतो आहे.
शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतरही स्थानिक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून नवीन रस्त्यांची रचना आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याच्या योजना तयार करण्यात येत असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील काही महिन्यांत या ठिकाणी रस्ते विस्तार व नवीन वाहतूक नियोजनाचे काम करण्यात येणार आहे. परंतु या आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास कमी होत चालला आहे.
