शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा – सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या कारकिर्दीत साताऱ्यात ज्या आधुनिक सुधारणा झाल्या, त्यात प्रामुख्याने पाण्याची सोय करणे हे त्यांचे एक मोठे योगदान आहे. 17 व्या शतकात राजधानी सातारा येथे आजच्या शुक्रवार पेठेत तत्कालीन बाजीराव पेठ या शहराच्या पिण्याच्या सोयीसाठी थोरले बाजीरावांनी विहीर बांधली, हीच विहीर आजची बाजीराव विहीर म्हणून महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाली आहे. या विहिरीचा केंद्राच्या पोस्ट खात्याकडून या ऐतिहासिक विहिरीचा गुणगौरव करण्यात आला आहे. या विहिरीचा इतिहास नेमका काय आहे, याचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
ही विहीर स्थापत्य शैलीचा एक अनोखा अविष्कार आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरची विहीर म्हणून या विहिरीची ओळख आहे. सातारा शहरासाठी कास पाणीपुरवठा योजना होण्याआधी तत्कालीन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या बाजीराव विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात होता. शंकराच्या पिंडीसारखा आकार असल्याने या विहिरीला 9 कमानी आहेत.
अत्यंत भक्कम दगडी बांधकाम असलेली विहीर संपूर्ण काळ्या पाषाणात आहे. सुमारे 100 फूट खोल ही विहीर आहे. बाजीराव विहिरीच्या भिंतीवर छत्रपती शाहू महाराजांचे राज्य चिन्हांकित शिल्प कोरण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील एकमेव अशी ही विहीर आहे. या विहिरीचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, जसे राज्य चिन्ह असलेली ही एकमेव विहीर आपल्याला भारतात पाहायला मिळते.
अनेक विहिरींचा आकार साधारणपणे गोल असतो. मात्र, ही बाजीराव विहीर शंकराच्या पिंडीच्या आकारात बांधण्यात आली आहे. आकाशातून याचे छायाचित्र घेतल्यास हा आकार स्पष्टपणे दिसून येतो. याच कारणामुळे केंद्राच्या पोस्ट खात्याकडून या ऐतिहासिक विहिरीचा गुणगौरव करण्यात आला आहे.
सध्या बाजीराव पेशवे यांची विहीर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांच्या मालकीची आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आठ विहिरींचे छायाचित्र केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याच्या पोस्ट कार्डवर छापण्यात येणार आहे. यात ऐतिहासिक बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्ट कार्डवर छापण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
