आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात बुधवारी रात्री (8 जानेवारी 2025) झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, 40 हून अधिक जखमी झाले आहेत.
वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने 9 जानेवारीपासून ‘वैकुंठ द्वार दर्शन’साठी टोकन देण्याची व्यवस्था केली होती. या टोकनसाठी अनेक काउंटर उघडण्यात आले होते, मात्र काउंटरजवळ सुमारे चार हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. बुधवारी रात्री, टोकन मिळवण्याच्या प्रयत्नात गोंधळ झाला आणि गर्दी मध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी या घटनेमागे कोणताही कट नसून हा एक अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. ते गुरुवारी तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
मंदिर प्रशासनाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले आहे. भाविकांना संयम राखण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तिरुपती बालाजी मंदिर हे विष्णूचा अवतार असून भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. दर वर्षी भारतातूनच नव्हे तर जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात.
